मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जबाब दिल्याने स्वप्ना पाटकर यांनी 2013 पासून अनेक वेळा संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. संजय राऊत यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे असं स्वप्न पाटकर यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी आज शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नीलम गोरे यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत त्या म्हणाल्या की, ” मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना याबाबत माहिती दिली, तसेच स्वप्ना पाटकर यांचं म्हणणं ऐकून घ्या, असे म्हटले होत. तसेच, संजय राऊत यांनाही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत बोलले होते. मात्र, त्यावर त्यांनी मलाच प्रश्न केला की, तुम्ही हे प्रकरण घेऊन माझ्याकडे आलातच का, असा गौप्यस्फोही नीलम गोऱ्हेंनी केला आहे. गोऱ्हे यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन हकीकत सांगितली. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून स्वप्ना पाटकर यांनी मांडलेलं नीलम गोऱ्हेंकडे केलेल्या तक्रारीची प्रतही वाचून दाखवली आहे. तसेच, ह्या तक्रारी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला आयोग आणि माझ्याकडेही त्यांनी दिल असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे.
स्वप्ना पाटकर यांनी पात्र लिहून आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत सप्ष्टीकरण दिले आहे. ”मी स्वप्ना पाटकर, माझ्या वृद्ध आईसोबत कालिना, सांताक्रूझ येथे वरील पत्त्यावर राहते. शांततेत आणि सन्मानाने राहणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संजय राजाराम राऊत यांच्याकडून होणारा छळ, पाठलाग आणि शिवीगाळ यामुळे मला सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. संजय राऊत यांनी फक्त माझाच छळ केला नाही तर माझे कुटुंब आणि प्रियजनांचाही छळ केला आहे. मी भीतीमध्ये आणि दडपणाच्या दबावाखाली जगत आहे. 2013 पासून मी संजय राऊतच्या छळातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला अद्याप कोणीही न्याय दिला नाही आणि मी अजूनही न्यायासाठी लढत आहे. याबाबत हजारो पत्रे पोलिस विभागाला आणि मला मदत करू शकणाऱ्या लोकांना मी लिहिली आहेत पण तरीही मला त्रास होत आहे. आज पुन्हा पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून माझे लक्षात आले आहे की मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातो,” असे आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.“
2 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास मी एक व्यक्ती बाईकवर पाहिली. बीकेसी वन या बिल्डिंगपासून माझा घरापर्यंत माझ्यामागे फिरताना पाहिली. मी घरी पोहोचेपर्यंत बाईक माझ्यामागे होती. हे माझ्यासोबत पूर्वी घडलेल्या सर्व गोष्टींसारखेच आहे. आता मला कोण आणि कशी मदत करेल हे मला माहीत नाही. 2013 मध्ये मुंबईत एका महिन्याच्या कालावधीत माझ्यावर दिवसा 2 वेळा हल्ला झाला जिथे सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. कोणी सापडले नाही असे सांगून प्रकरणे बाजूला ठेवण्यात आली. माझ्या कोणत्याही प्रकरणात मुंबई पोलिसांना काहीच सापडले नाही हे कसे शक्य आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. (FIR 239/2013 Mahim Poice Station, FIR 324/2013 Vakola Police Station) संजय राऊत यांनी मला फॉलो करण्यासाठी आणि माझा ठावठिकाणा शोधण्यासाठी स्टार सुरक्षा गुप्तहेर नियुक्त केले होते. मी कुठे आणि कोणासोबत आहे हे सांगणारे राऊतचे ईमेल आणि मेसेज मला यायचे. त्याची तक्रार केली होती. पण त्यावर माझी तक्रार नोंदवली गेली नाही, असेही पाटकर यांनी म्हटले आहे.
पुन्हा त्रास सुरु झालाय. पुन्हा नवीन तक्रारी,पुन्हा नवीन कागदांवर शिक्के. खूप वर्ष झाली तक्रारी करून. आता पुन्हा कागदं जमा होणार की न्याय मिळणार. प्रश्न एवढाच कि कोण न्याय देणार आणि कधी ?