Baba Kalyani : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची यादी काढली तर त्यात पारशी, गुजराती, सिंधी लोकांचीच नाव पहायला मिळतात आणि यात मराठी माणसाचं नाव नसतं, अशी खंत मराठी माणसाच्या मनात होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता मराठी माणूसही जगात सगळीकडे सगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. याचे उदाहरण म्हणजे ‘फोर्ब्सच्या यादीत मराठी महिलेचा समावेश’ आणि ‘जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाला विदेशी सरकारकडून पुरस्कार’. जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणूस नेमकं कोण आहे? त्याला विदेशी सरकारकडून पुरस्कार का मिळाला? आदी विषयावर महा टॉक्सचा हा खास लेख.
‘Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश’ हा सविस्तर लेख यापूर्वीच वेबसाईटवर प्रकाशित झालेला आहे. ‘फोर्ब्सच्या यादीत मराठी महिलेचा समावेश’ यावर क्लिक करून तुम्ही ते वाचू शकता.
जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणूस कोण?
बाबासाहेब नीळकंठ कल्याणी हे एक भारतीय उद्योजक आहेत. त्यांनी कल्याणी समूहाची फ्लॅगशिप कंपनी, भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे आणि जर्मनीच्या थिसेनक्रुप (ThyssenKrupp) नंतर त्यांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची फोर्जिंग उत्पादक कंपनी आहे. नामवंत आंतरराष्ट्रीय उद्योजक म्हणून ओळखले जाणारे फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) बाबा कल्याणी हे जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणूस आहे.
बाबासाहेब कल्याणी (Baba Kalyani)यांचं सुरुवातीचं जीवन
७ जानेवारी १९४९ ला बाबासाहेब कल्याणी यांचा जन्म पुण्यातील कल्याणी कुटुंबात झाला. आई सुलोचना आणि वडील नीळकंठ कल्याणी या दाम्पत्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांनी बेळगाव येथील राष्ट्रीय मिलिटरी हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करून पुण्यातील नगरवाला शाळेत पुढील शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी बीआयटीएस पिलानीमधून १९७० मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई (ऑनर्स) चं शिक्षण पू्र्ण केलं. त्यानंतर मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी एमएस पदवी मिळवली. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांचे धाकटे बंधू प्रताप पवार हे त्यांचे कॉलेजचे मित्र असून त्यांचा हा ग्रुप अभ्यासात हुशार होता. ७४ वर्षाच्या बाबा कल्याणी आणि त्यांच्या पत्नी सुनीता कल्याणी यांना अमित नावाचा एक मुलगा आहे.
बाबासाहेब कल्याणी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
बाबासाहेब कल्याणी यांचे वडील नीळकंठ कल्याणी हे देखील व्यावसायिक होते. त्यांनीच भारत फोर्जची स्थापना केली होती. नीळकंठ कल्याणी हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोळे गावचे असून एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नीळकंठांचे वडील शेती सोबतंच हळदीचा व्यापार करायचे. मात्र वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर निळकंठ यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून घरची जबाबदारी उचलावी लागली.
नीलकंठ कल्याणी आणि यशवंतराव चव्हाण
याच काळात नीळकंठ कल्याणी यांचा महाराष्ट्रातील दिग्गज नेते यशवंतराव चव्हाणांशी संपर्क आला. कल्याणी कुटुंबाने यशवंतरावांना त्यांच्या लहानपणीच्या काळात साताऱ्यात मोठी मदत केली होती. स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांची मोठी मदत झाली होती. यशवंतराव हे उपकार विसरले नव्हते. त्यांनी निळकंठ कल्याणी यांना शंतनुराव किर्लोस्कर यांच्याकडे पाठवून त्यांची मदत केली. पुढे किर्लोस्करांच्या मदतीने नीळकंठ कल्याणीने ‘कल्याणी फोर्ज’ आणि ‘कल्याणी ब्रेक’ यांची स्थापना केली.
बाबा कल्याणींची कारकीर्द
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या २३ व्यावर्षी बाबा कल्याणी यांनी व्यवसायात उडी मारली. बाबा कल्याणी हे १९७२ मध्ये भारत फोर्ज या जागतिक उत्पादन कंपनीत सामील झाले. पण त्यांचे कंपनीतील हे आगमन काही लोकांना बिलकुल आवडलेले नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. मात्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी बाबा कल्याणी यांची कायम साथ दिली. पुढे त्या दोघांनी मिळून कल्याणी ग्रुपचे हजारो कोटींचे साम्राज्य उभे केले. सध्या कल्याणी समूहात दहा हजार पेक्षा अधिकजण कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावावरून पुण्यात एका उपनगराला कल्याणीनगर असे नाव देखील मिळाले आहे.
बाबा कल्याणी यांना लहानपणा पासूनच मशीनगन्स, रायफल यांच्याविषयी फार आकर्षण होते. म्हणून भारताला संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहावे लागते. याचं त्यांना वाईट वाटायचं. पूर्वी भारतात संरक्षण साहित्य बनवायची जबाबदारी फक्त सरकारी कंपन्यांकडे होती. पण नवीन सरकारने ही बंधने शिथिल केली आणि प्रायव्हेट सेक्टरलाही हे क्षेत्र खुले केले. या संधीची बाबा कल्याणी तर जणू वाटच पाहत होते. त्यांनी संधीचं सोन करत डीआरडीओच्या मदतीने ही १५५ एमएम तोफ बनविली. या अगोदर त्यांनी टाटा समूहासोबत मिळून पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्डाच्या (ओएफबी) गन कॅरेज फॅक्टरीने २०१० ला ‘धनुष’ या बोफोर्स हॉबिट्झ एफएच-७७-बी या स्वीडिश तोफेवर आधारित तोफ बनवली होती. तसंच मोदी सरकारच्या काळात सुरु झालेल्या मेक इन इंडिया योजनेचा या तोफेच्या निर्मितीमध्ये मोठा फायदा झाला. त्याबरोबरच मारुतीपासून ते मर्सिडीज पर्यंत जगभरातल्या प्रत्येक गाडीत भारत फोर्जचे कंपोनंन्ट वापरले जातात. त्याबदोबरच भारताबाहेर देखील भारत फोर्जचे कारखाने उभे आहेत.
कल्याणींचे महाराष्ट्रात स्वतःचे पवन टर्बाइन असून ते समूहाच्या उत्पादन कार्यासाठी “हरित ऊर्जा” निर्माण करतात. तसंच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठीही सौर ऊर्जा उपकरणे विकसित करण्याचे कार्य त्यांची कंपनी करत आहे. ही कंपनी वाहने, ऊर्जा, खनिज तेल आणि वायू, बांधकाम, खाणकाम, रेल्वे इंजिने आणि विमान उद्योगांशी निगडीत आहे.
सामाजिक कार्यकर्ते बाबा कल्याणी
बाबा कल्याणी हे प्रथम पुणे एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ही एक स्वयंसेवी संस्था असून त्याची स्थापना २००० मध्ये झालेली आहे. या संस्थेमार्फत स्थानिक समुदायाच्या वंचित वर्गातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचं कार्य केलं जात. तसेच स्वच्छ आणि उत्सर्जनमुक्त वातावरणात योगदान देण्यासाठी कल्याणींनी घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी विविध ऊर्जा-कार्यक्षम पवन टर्बाइन तयार करण्यासाठी केनर्सिस लिमिटेडची स्थापना केली.
पुरस्कार आणि कौतूक
बाबा कल्याणी यांना २००८ मध्ये पद्दमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरी यांनी बाबा कल्याणी यांचं कौतूक केलं. “जगभरात हजारो कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करणारे बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) उत्पादन क्षेत्राचा वाटा किमान दुप्पट करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी किमान शंभर बाबा कल्याणी निर्माण झाले पाहिजेत”, असे उद्गार यावेळी नितीन गडकरींनी काढले होते.
बाबा कल्याणी यांनी स्वीडनमधील व्यापार आणि व्यवसाय सहकार्य वाढविण्यात दिलेल्या योगदानासाठी स्वीडिश सरकारने त्यांना ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना Global Economy Prize हा पुरस्कार, तर २००९ मध्ये किल इन्स्टिट्यूटद्वारे व्यवसायासाठी ‘जर्मन बिझनेसमन ऑफ द इयर पुरस्कार’ मिळाला. इतरही बरेच पुरस्कार त्यांना मिळालेत. भारत सरकारने ६ जून २०१८ ला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) संबंधित धोरणांचा अभ्यास करण्यासाठी बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्सची स्थापना केली. १९ फेब्रुवारी २०१५ ला कल्याणी समूहाने इस्रायलच्या राफेल प्रगत संरक्षण प्रणालींसह संयुक्त उपक्रमाची घोषणा केली.
जपान सरकारकडून पुरस्कार
पुणे-भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक नाते दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी जपान-इंडिया बिझनेस लीडर्स फोरमचे ते सह-अध्यक्ष आहेत. दोन्ही देशांमध्ये उद्योगांना येणाऱ्या आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी बाबा कल्याणी यांचा कायमच पुढाकार असतो. तसंच भारतात जपानमधील उद्योगांनी गुंतवणूक करावी, विस्तार करावा, यासाठी त्यांनी कायमच प्रोत्साहन दिले आहे. ऑर्डर ऑफ रायजिंग या गौरवाची सुरवात एम्परर मैजी यांनी १८७५ मध्ये केली. जपान सरकारचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, जपानी संस्कृतीचा प्रसार, आपल्या क्षेत्रातील प्रगती व पर्यावरणाचे संवर्धन व कल्याण यांचा विकास यासाठी योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
बाबा कल्याणी यांची प्रतिक्रिया
जपान सरकारकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्यात आल्यानंतर बाबा कल्याणी यांनी प्रतिक्रिया दिली की, “डेकोरेशन्स-ऑर्डर ऑफ रायजिंग सन हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे व अभिमान वाटतो आहे. या सन्मानाबद्दल मी जपानच्या सरकारचा आभारी आहे.”
तुम्ही हे देखील वाचू शकता
टाटा एअरलाईन्सच्या एअर इंडिया या नामकरणाला 29 जुलै रोजी 77 वर्षे पूर्ण