अहमदनगर : अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण प्रचंड प्रमाणात ढवळले गेले आहे. नुकतीच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत. यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये चिंतेचा वातावरण पसरल आहे.
या सभेमध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” बाळासाहेब थोरात यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे पाटील हे 28 मे 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना भेटून आले. ही घटना बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. दुसरी बाळासाहेबांसाठी धोक्याची घंटा असणारी घटना म्हणजे ९ जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता खरगे हे सोलापूरहून बंगलोरला गेले. तत्पूर्वी 8 जून 2023 रोजी राधाकृष्ण विखे-पाटील खरगेंना गुप्तपणे भेटले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी सांगत नाही. पण भाजपची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिले आहेत. ” असा टोला त्यांना काँग्रेसला लगावला आहे.
तसेच, ” मी बाळासाहेब थोरातांना सांगू इच्छितो की, ही परिस्थिती चांगली नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही स्वत:चा पक्ष वाचवावा. अन्यथा तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष कधी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही. ” असा खोचक सल्ला देखील त्यांनी थोरातांना दिला आहे.