नाशिक : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकच्या जागेबाबत आपला आग्रह सोडला आहे. नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते प्रचंड आग्रही होते. तर भाजपचे मोठे नेते हेच आपल्या नावाचा आग्रह धरत असल्याचा देखील ते म्हणाले होते.
दरम्यान आज स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधून ते म्हणाले की, ” मी नाशिक मधून लढावं असं मोदी-शहांनी सुचवलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र मी नाशिक मधून लढणार नाही, मी माघार घेतली आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाचे लोक माझ्यासोबत होते. मात्र पाच वर्षांमध्ये मी जे काम केले आहे त्यामुळे त्यांनी मला समर्थन दिलं होतं. परंतु मी माघार घेत आहे. ” असं आज त्यांनी जाहीर केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे मोठे नेते त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं स्पष्टपणे म्हणत होते. यावर देखील आज त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली. ते म्हणाले की, ” होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला. आम्ही देवगिरीवर गेलो होतो. त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. गृहमंत्री अमित शहा ,मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळांसाठी जागा मागितली. परंतु अमित शहा यांनी माझं नाव पुढे केलं. ” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक बाबत महायुती समोर पेच होता. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ” जागा महायुतीने अधिकृतरित्या जाहीर करायला पाहिजे होती. अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. तीन आठवडे गेले तरी उमेदवार जाहीर झाले नाहीत. विरोधी पक्षांचे उमेदवार जाहीर होऊन त्यांचा प्रचार देखील पुढे गेला आहे. यापेक्षा जास्त उशीर झाला तर नाशिकमध्ये महायुतीला अडचण येऊ शकते. सध्या जी संधीग्धता आहे त्यामुळे मी हा गोंधळ दूर करण्यासाठी भूमिका जाहीर करत आहे. ” असं ते म्हणाले आहेत.