AIR INDIA: कोरोनाच्या काळात देश संकटात असताना एका उद्योग समूहाने देशासाठी तब्बल १५०० कोटी रुपये दान करत असल्याची घोषणा केली. हा उद्योग समूह दुसरा तिसरा कोणाी नसून मोठ्या आदराचं स्थान कमावलेला टाटा उद्योग समूह होता याची आपण सर्वांना कल्पना आहे.रतन टाटा यांच्या मालकीचा असलेला टाटा उद्योग समूह देशातील बलाढ्य उद्योगसमूह म्हणून ओळखला जातो. अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या टाटा उद्योग समूहाच्या ( TATA GROUP ) टाटा एअरलाईन्सच्या (TATA AIR LINES) एअर इंडिया(Air India) या नामकरणाला २९ जुलै रोजी ७७ वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने ‘महाटॅक्स’चा टाटा एअरलाईन्स ते एअर इंडियाचा प्रवास सांगणारा हा खास लेख.
एअर इंडियाची ( AIR INDIA) स्थापना आणि प्रारंभीचा काळ
१९३२ साली टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने एअर इंडियाची सुरवात झाली. कालांतराने याचे नामकरण टाटा एअरलाईन्स असे झाले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल वाहून नेण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमानातून वाहून नेले. हे विमान मद्रासला गेलं, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Nevill Vintcent हे होते. जे आर डी टाटा यांच्यासोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. प्रारंभीच्या काळात कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवेला प्राधान्य दिले,कराची आणि मद्रास दरम्यान आणि पुढे अहमदाबाद आणि मुंबई मार्गे ही सेवा प्रदान केली जात होती.
पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाणाचा महत्वपूर्ण टप्पा पार केला. याकाळात पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा कंपनीने मिळवला.
असं झालं नामकरण….
१९३८ साली कंपनीचे नाव बदलून’टाटा एअर लाईन्स’ असे करण्यात आले. दिल्ली आणि कोलंबो या शहरांना जोडणारी विमानसेवा याच काळात सुरू झाली. १९४६ च्या टाटा मासिक बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ‘बॉम्बे हाऊसमधील लोकप्रिय मतानुसार नाव निवडणे चांगली कल्पना होती. त्यानुसार, सर्व टाटा कर्मचार्यांना मतदानाची कागदपत्रे वितरीत करण्यात आली. यात इंडियन एअरलाइन्स, पॅन-इंडियन एअरलाइन्स, ट्रान्स-इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया अशा चार नावांचे पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी त्यांना त्यांची पहिली आणि दुसरी पसंती कोणती हे ठरविण्यास सांगितले. यातून ‘एअर इंडिया’ या नावाची निवड करण्यात आली.
टाटा एअरलाईन्स आणि दुसरे महायुद्ध
त्याकाळात सुरू असणाऱ्या दुसऱ्या महायुद्धा दरम्यान निर्वासितांची सुटका करणे,सैन्याची वाहतूक करणे,दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक आणि विमानांच्या देखभालीची महत्वपूर्ण जबाबदारी टाटा एअरलाईन्सनी उत्तमरीत्या पार पाडली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा हवाई वाहतूक सुरू करण्यात आली तेव्हा २९ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाईन्स पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि तिचं नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये टाटा एअरलाईन्सची ४९% भागीदारी भारत सरकारने विकत घेतली. १९५३ साली या कंपनीचं राष्ट्रीयीकरण झालं.
भारत सरकारने टाटा एअर लाईन्स ला विकत घेतले
१९५३ मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. जेआरडी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. १९६२ साली परत एकदा कंपनीचे नाव बदलून ‘एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड’ असं करण्यात आलं. २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलने ताफ्यात आपले पहिले बोईंग ७०७ – ४२० समाविष्ट केले. एअर इंडिया इंटरनॅशनलने १४ मे १९६० रोजी न्यूयॉर्कला आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली.
८ जून १९६२ रोजी एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले आणि ११ जून १९६२ रोजी एअर इंडिया जगातील पहिली जेट विमान कंपनी बनली. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली. २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली.
२०२२ मध्ये एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांनी विकत घेतले
२०१७ मध्ये सरकारने एअर इंडिया विक्रीसाठी काढली. परंतु कंपनीवर कर्जाचा डोंगर असल्याने कोणत्याही गुंतवणूकदाराने स्वारस्य दाखवले नाही. परिणामी ही एअर इंडिया ची विक्री प्रक्रिया २०२२ पर्यंत बारगळली. पुढे सरकारने ३०,००० कोटी रुपये किंमत कमी करून १००% हिस्सा विक्रीस काढला. स्पाईस जेटच्या अजय सिंग आणि टाटा उद्योगसमूहाने बोली प्रक्रियेत भाग घेऊन अंतिमतः १८,००० कोटी रुपयांना बोली लावत टाटा उद्योगसमूहाने एअर इंडियाची मालकी मिळवली.
हे दिखील वाचा ,
उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का ?