राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. सुरुवातीला शिंदे-भाजप यांचं ‘डबल इंजिन’चं सरकार अशी ओळख निर्माण करणाऱ्या या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गट सामील झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ सुद्धा घेतली. यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे, अशी दबक्या आवाजात रंगणारी चर्चा आता खरी ठरत असल्याचं दिसतंय.
शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांविषयीची (Bacchu Kadu on Ajit Pawar) आपली नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आधीच बच्चू कडू नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. कधी सरकारवर ताशेरे देखील ओढले. मात्र आता राष्ट्रवादी देखील सत्तेत सहभागी झाल्याने अजित पवारांना अर्थमंत्री केलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे अजितदादांना अर्थमंत्री पद देऊ नका अशी मागणीच कडू यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या कमी होणार, हे आता निश्चित आहे. त्यातही महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा आपल्या मतदारसंघात निधी देत नाहीत, दुजाभाव करतात, असा आरोप करणाऱ्या शिंदे गटाची आता कोंडी झाली आहे. मात्र, आता पुन्हा राष्ट्रवादीकडेच अर्थ खातं गेलं तर शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
अजित पवार युतीत आल्याने आता कुणाच्या वाट्याला किती पदं येणार? कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण रस्सीखेच मात्र नक्कीच सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर आज नागपुरात बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. कडू म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात अजित पवारांमुळे आम्ही बंड केलं असं सांगत होतो. पण तेच अजितदादा आता सरकारमध्ये आल्याने आमच्यासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे.”
“मागच्या 20 वर्षांत मी जे शिकलो नाही, ते या 5 वर्षांत शिकलो. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा म्हंटलं होतं. पण आता त्यांना त्यांच्यासोबत युती करावी लागली. त्यांना वरून आदेश असतील. त्यामुळे त्यांनी केलं असेल”, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
तर अजित पवारांना अर्थमंत्री करू नये, अशी इच्छा देखील कडू यांनी व्यक्त केली. अजित पवार जर पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले तर राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी आणि इतर आमदारांना कमी निधी, असा पूर्वीचाच प्रकार परत घडेल. त्यामुळे त्यांच्याकडे अर्थ खातं देवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे, असंही कडू यांनी सांगितलं. तसंच येणाऱ्या काळात निधी वाटपात ढवळाढवळ झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.