मुंबई : सध्या भाजप आणि शिंदे गट हे सत्तेत आहेत. असं असताना आज उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. कल्याण डोंबिवलीच्या उल्हासनगरमध्ये भाजप आमदारांन शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर थेट गोळीबार केला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होतो आहे. भर पोलीस स्टेशनमध्येच सत्तेत असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी असा गोळीबार करणे यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या गोळीबाराच्या घटनेनंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून लिहिले आहे की, ” महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे याविषयी तक्रार मी करणार आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. ” असं त्यांनी लिहिल आहे.
तसेच, ” इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ? गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात, कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेत. असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता ! ” अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी देखील या घटनेवर कडाडून टीका करताना म्हणाले आहे की, ” महाराष्ट्रात दीड वर्षापासून माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. झुंडशाही आणि गुंडगिरीतून हे सरकार आले आहे. पैशाचे व्यवहारातून सरकार आल आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा प्रकार आहे. गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहे. ” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातून चांगलेच उमटत आहेत. विरोधी पक्षातून कडाडून टीका होत असतानाच यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
https://www.facebook.com/emahatalks/videos/3702650133347159/










