Samruddhi Mahamarg Accident : मुंबई नागपूर या राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा एक्स्प्रेस वे म्हणजेच समृद्धी महामार्ग हा आतापर्यंतचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. मात्र सुरुवातीपासूनच हा महामार्ग त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत राहिला आहे. काल रात्री (30 जून) या महामार्गावर आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात झाला आणि त्यात 25 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Samruddhi Mahamarg Accident yesterday) या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापासूनच हा महामार्ग अपघातासाठी चर्चेत आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गामुळे प्रवास वेगवान झाला, प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र त्यासोबतच अपघात देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे..
समृद्धी महामार्गावर अपघात कशामुळे होतात? (What was the cause of the Samruddhi Mahamarg accident)
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने त्याचा अभ्यास करण्यासाठीची गरज निर्माण झाली होती. काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या Transportation इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांनी तीन महीने संशोधन करून काही निरीक्षणे मांडली आहेत. समृद्धीवर वारंवार होणाऱ्या अपघाताला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत याबाबत काही महत्त्वाची निरीक्षणे या अभ्यासगटाने नोंदवली आहेत.
महामार्ग संमोहन (Highway hypnosis Samruddhi Mahamarg)
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांना महामार्ग संमोहन हे एक कारण असल्याचे निरीक्षण VNIT च्या अभ्यासगटाने नोंदवले आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांमध्ये अनेक चालक महामार्ग संमोहनामुळे वाहनावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत आणि त्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे. जवळपास ३३ टक्के अपघाताला महामार्ग संमोहन जबाबदार असल्याचे या अभ्यासगटाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
महामार्ग संमोहन म्हणजे काय? (What is Highway Hypnosis)
महामार्ग संमोहन ही एक तांत्रिक बाब आहे. एखादा महामार्ग जेव्हा एकाच सरळ रेषेत असतो, त्या महामार्गावरुन गाडी एकाच सरळ रेषेत कोणत्याही अडथळ्याविना बराच वेळ चालत असते तेव्हा चालकाच्या शरिराची हालचाल स्थिर होते. अशावेळी चालकाचा मेंदू देखील अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रक्रिया देण्यासाठी तयार नसतो. या स्थितीला महामार्ग संमोहन म्हणतात. महामार्ग संमोहनामुळे कित्येक मिनीटे एकसारख्या स्पीडमध्ये विनाअडथळा गाडी चालवणाऱ्या चालकाच्या गाडीसमोर अचानक काही आल्यास किंवा टायर फुटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास गाडीवर नियंत्रण मिळवणे चालकाला शक्य होत नाही. ज्यामुळे अपघात घडतो.
महामार्ग संमोहन मध्ये जाण्यासाठी महत्वाचे घटक कोणते?
समृद्धी महामार्ग हा नेमकंच निर्माण झालेला नवाकोरा महामार्ग आहे. महामार्गाच्या आजुबाजूला कुठल्याही प्रकारचे होर्डिंग्स, हॉटेल, दुकानं, गाव असं काहीही नाही. हा महामार्ग एकाच रेषेत असल्याने चालक लवकर महामार्ग संमोहनाला बळी पडू शकतो.
चालकाला डुलकी लागणे
पुरेशी झोप न झाल्याने वाहन चालकाला गाडी चालवताना डुलकी लागु शकते. नेमकं याच वेळेला चालक वाहनावरील नियंत्रण गमावतात आणि अपघात घडतात. अशावेळी कधी दुसऱ्या लेन मधील वाहनाला गाडी धडकल्याने, तर कधी डिव्हायडरला गाडी धडकून वाहनाचा अपघात होतो. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांमध्ये या कारणाने अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
अती वेग
समृद्धी महामार्ग हा अतिशय चांगल्या दर्जाचा रस्ता असलेला महामार्ग आहे. या रस्त्यावर कुठलेही खड्डे, स्पीडब्रेकर नसल्याने वाहनं देखील प्रचंड वेगाने यावरून प्रवास करतात. महामार्गावर ठिकठिकाणी वेगमर्यादा असलेले सूचनाफलक लावलेले दिसतात मात्र अनेक वाहनचालक त्याचे पालन करत नाहीत. समृद्धी महामार्गावर जास्तीत जास्त १२० किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा वाहनांना घालून दिलेली आहे. अवजड वाहनांसाठी यापेक्षा कमी वेगमर्यादा आहे. (Speed Limit on Samruddhi Mahamarg) ही वेग मर्यादा ओलांडून अतिवेगाने वाहन चालविणे देखील धोक्याचे असते. अतिवेगाने असलेले वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन अपघात घडण्याची शक्यता असते.
लेनची शिस्त न पाळणे
व्हीएनआयटीच्या अभ्यासगटाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार ५१% ट्रक चालक हे ठरवलेल्या लेनवरून गाडी चालवत नाही. महामार्गावर जड वाहनांसाठी लेन आणि वेगमर्यादा या दोनही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. त्याचे पालन न केल्याने अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.
खराब टायर
अनेकदा वाहनांचे टायर फार वापर झाल्यानंतर खराब होतात. त्याकडे चालकांनी लक्ष न दिल्याने महामार्गावर याच टायरचा पुन्हा वापर केल्याने गाडी वेगात धावत असतानाच अचानक टायर फुटून अपघात होत आहेत. तसेच गाडी वेगाने असल्याने टायरमधील हवा गरम होते. त्यामुळे टायरच्या आतमधील प्रेशर वाढून टायर फुटण्याची शक्यता जास्त असते. याच कारणाने समृद्धी सारख्या महामार्गावर गाडी वापरताना टायरमध्ये ‘नायट्रोजन’ हवा भरण्याचे सांगितले जाते.
वाहतूक नियमांचे पालन न करणे
महामार्गावर वाहन चालवताना आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, तसेच अपघात होऊ नये म्हणून महामार्गावर चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणं आवश्यक असते. मात्र सगळेच चालक या सर्व नियमांचं पालन करत नसतात. परिणामी महामार्गवर अपघात होताना दिसतात.
अपघात कमी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
वाहनचालकाला ‘महामार्ग संमोहन’ पासून वाचवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी साईनबोर्ड लावणे गरजेचे आहे. स्पीडलिमीट, लेन बद्दलची माहिती, इशारा देणारे सुचनाफलक महामार्गावर ठिकठिकाणी लावले गेले पाहिजेत.
त्याबरोबरच चालकाने बरोबर झोप घेऊनच गाडी चालवणे देखील गरजेचे आहे. वाहन चालकांनी-मालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सलग खूप वेळ गाडी चालवु नये, गाडी चालवताना चालकाने छोटे छोटे ब्रेक घ्यायला हवेत.
याबरोबरच वाहतूक नियमांचं पालन करणे, वाहनांची वेळोवेळी देखभाल करणे, टायर प्रेशरकडे लक्ष देणे या सवयीमुळेही अपघात थांबवता येतील.