नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केला आहे. वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच 32 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा धक्कादायक आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी समूह इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात आणि भारतात दुप्पट दराने कोळसा विक्री करतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
देशातील नागरिकांनी वीजेचे स्विच ऑन करताच अदानींच्या तिजोरीत पैसे जमा होतात. अदानींना पंतप्रधान मोदी संरक्षण देत आहेत. जगातील इतर देशांमध्ये अदानींच्या व्यवहाराची चौकशी होत आहे. मात्र, भारतात अदानींना कोरा चेक दिला असल्याची टीका राहुल यांनी केली. त्यांना जे काही करायचे आहे ते करू देत, परंतु लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी अदानींची चौकशी का करत नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.
प्रसारमाध्यमांवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून अदानींनी आधीच विजेचे दर वाढवून जनतेकडून १२ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. विजेच्या वाढत्या किमतीमागे अदानीचा हात आहे. यावर माध्यमे प्रश्न उपस्थित करत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. अशा बातम्यांमुळे सरकार पडते.
ओसीसीआरपी म्हणजे दी ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या स्वयंसेवी संस्थेने ऑगस्ट महिन्यात अदानी समूहाच्या व्यवहारावर अहवाल प्रकाशित केला होता. अदानी समूहातील गुंतवणुकीवर यामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.अदानी समूहात 2013 ते 2018 दरम्यान झालेल्या गैरव्यवहारामागे बरेच गुंतागुंतीचे व्यवहार आहेत. हे सहजासहजी कुणाच्याही लक्षात येणार नाहीत, असंही ओसीसीआरपीने म्हटलंय. या आरोपांमागे त्यांनी बराच तपास केल्याचाही दावा केला आहे. मॉरिशसमधील दोन फंड (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) यामध्ये सहभागी होते. या दोन्ही फंडाचे व्यवस्थापक हे अदानी कुटुंबीयाचेच व्यावसायिक भागीदार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.










