नांदेड : नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी रुग्णांचे मृत्यू झाले. यामध्ये 24 रुग्णांमध्ये बारा नवजात बालकांचा समावेश आहे. (Nanded Hospital Deaths) या बालमृत्यू प्रकरणावरून विरोधक आणि सामान्य जनतेने देखील सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले आहेत. असं असताना चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. चित्रा वाघ यांनी थेट या मृत्यूप्रकरणी गरोदर मातांना आरोपीच्या चौकटीत उभे केले आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ? (Chitra Wagh statement on Nanded Hospital Deaths)
नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने देखील दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ या म्हणाल्या की, गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत. छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले, त्यांचा व्हिडिओ मी माध्यमांना देते. गोळ्या दिल्या जातात, पण आम्ही खात नाही. पोषण आहार दिला जातो. आम्ही कधी खातो, कधी खात नाही. डॉक्टरांनी या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. या गोळ्या घेतल्या असत्या, तर मुलं तंदुरुस्त झाली असती आणि तुमच्या मांडीवर खेळत असली असती. असं यावेळी या मातांना सांगितल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
त्याचबरोबर सरकार औषध आणि पोषण आहार पुरवू शकतो. त्यांना गिळायला देऊ शकत नाही. आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र गर्भवती माता या गोळ्या घेतात की नाही ? इथून आपल्याला बघण्याची गरज आहे. असे देखील मत यावेळी चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत.