Mewat Violence : हरियाणाच्या मेवात-नूहमध्ये सोमवारी सुरू झालेला हिंसाचार गुरुग्रामपर्यंत (Mewat Violence) पोहोचला. मंगळवारी रात्री उशिरा जमावाने येथील मशिदीवर हल्ला करून मौलवीची हत्या केली. एवढेच नाही तर दुकानही जाळण्यात आली. या हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
नूहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निमलष्करी दलाच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नूह, पलवल, मानेसर, सोहाना आणि पतौडीमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. आरएएफने अनेक ठिकाणी फ्लॅग मार्च काढला. या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने आज देशव्यापी निषेध पुकारला आहे. दुसरीकडे, हरियाणातील हिंसाचार पाहता उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमधील भरतपूरनंतर अलवरमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे.
दोषी किंवा कट रचणाऱ्याला सोडले जाणार नाही – मनोहर लाल खट्टर
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, हरियाणा पोलिसांच्या 30 तुकड्या आणि निमलष्करी दलाच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निमलष्करी दलाच्या 14 तुकड्या नूहमध्ये, 3 पलवलमध्ये, 2 फरिदाबादमध्ये तर एक गुरूग्राममध्ये तैनात आहेत. सीएम खट्टर यांनी शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. कोणीही दोषी किंवा कट रचणाऱ्याला सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. सध्या नूह आणि आसपासच्या भागात परिस्थिती सामान्य आहे, सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
हिंसाचार कसा पसरला? (Mewat Violence )
नुह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. सोमवारी ब्रिज मंडळाच्या यात्रेदरम्यान यात्रेकरूंवर दगडफेक करण्यात आली. त्याचे काही वेळातच हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या. सायबर पोलीस स्टेशनवरही हल्ला झाला. गोळीबारही करण्यात आला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. पोलिसांवरही हल्ले झाले. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. नूह हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन होमगार्ड तर 4 सामान्य नागरिक आहेत. नूह येथील हिंसाचारप्रकरणी 26 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तर 116 जणांना अटक करण्यात आली आहे.