सध्या सुरु असलेल्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेकांना कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची वारंवार इच्छा होते. पण कामामुळे आपल्याला तसं करता येत नाही. पण तुम्हाला माहितेय का? आपण पर्यटक म्हणून जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आपल्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, देशाच्या तिजोरीत आर्थिक मदत होते इतकंच नव्हे तर देशाच्या जीडीपीत ही आपलं फिरणं मोलाचं ठरतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसं शक्य आहे. तर आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि फायदे काय? याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. आज जागतिक पर्यटन दिन आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी ही खास माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.
भारत हा देश त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्यपूर्ण भूगोल आणि ऐतिहासिक खुणा यासाठी ओळखला जातो, या खुणा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. याव्यतिरिक्त, भारतामध्ये विविध धर्म, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती आणि परंपरा पाहायला मिळते. ही विविधता भारताला पर्यटकांसाठी एक अनोखे आणि आकर्षक स्थळ बनवते. भारताच्या पर्यटन उद्योगात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2022 ते 2032 या कालावधीत GDP सरासरी 5.8 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. यावरुन आपल्या कळले असेलच की, पर्यटनामुळे भारताच्या अर्थव्यव्सथेत हातभार लागत आहे. भारतामध्ये जगातलं अव्वल पर्यटन केंद्र बनण्याची क्षमता आहे. लवकरच भारतात तशा योजना आणि धोरणं आखली जात आहे.
पर्यटनामुळे भारताला काय फायदे होतात?
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळते. पर्यटन क्षेत्रात गुंतलेल्या सेवा आणि वाहतूक क्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा सर्वाधिक फायदा होतो. रिक्षा, बस, ट्रेन, टॅक्सी चालक, घोडेस्वार, दुकानदार, गाईड, हॉटेल, हायवे लगतचे ढाबे या क्षेत्रामुळे यांना देखील फायदा होतो. ताजमहाल, लाल किल्ला आणि कुतुबमिनार यांसारखी अनेक पर्यटन स्थळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास मदत होते. पर्यटनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात मदत होते. हे देशाच्या एकूण जीडीपी विकासात मदत करते. त्यातून स्थानिकांना आपला उदरनिर्वाह चालण्यास मदत होते.
पर्यटन क्षेत्रामुळे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्यास मदत होते. पर्यटनामुळे विविध संस्कृतींच्या लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. विविध संस्कृतीचे लोक एकत्र भेटतात आणि एकमेकांना समजून घेतात. यामुळे त्यांना एकमेकांबद्दल आदर निर्माण करण्याची संधी मिळते. त्यामुळे सांस्कृतिक एकोपा वाढतो. आरोग्य आणि निरोगीपणा सुधारण्यासाठी योग, एरोबिक्स आणि इतर थेरपी देणारी अनेक पर्यटन स्थळे भारतात आहेत यासाठी देखील लोकं भारताला भेट देतात. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेचा महसूल वाढतो, हजारो नोकऱ्या निर्माण होतात, देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास होतो आणि परदेशी आणि नागरिक यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची भावना निर्माण होते.
2022 मध्ये, भारताच्या अर्थव्यवस्थेत भारताच्या पर्यटन क्षेत्राचे योगदान 15.7 ट्रिलियन रुपये इतके होते. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (WTTC) च्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया सिम्पसन म्हणाल्या की, या वर्षाच्या अखेरीस ते 16.5 ट्रिलियन रुपयांचे असेल. “पुढील दहा वर्षांचा अंदाज सुमारे 37 ट्रिलियन रुपयांचा आहे. सध्याच्या वाटचालीत भारताकडून हेच साध्य होईल, अशी आमची अपेक्षा आहे. भारतातील पर्यटन क्षेत्रात या वर्षाच्या अखेरीस 39 दशलक्ष लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली.
येत्या काळात भारताच्या पर्यटन क्षेत्राला वेगळं वळण मिळणार आहे, पर्यटन क्षेत्राचे भारताच्या अर्थव्यवस्थेत अमूल्य योगदान ठरणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमामध्ये ही देशवासियांना सांगितलं होतं. जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच भारत जगातील अव्वल पर्यटन केंद्र बनणार असं सांगितलं जातंय.