सातारा : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याच्या या पोस्ट नंतर दोन गटात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली असून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, साताऱ्यातील पुसेसावळी येथे रविवारी एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर दोन गटात तणाव निर्माण झाला. या पोस्टवरून लोकांचा गैरसमज होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच आवश्यक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय.

सातारा पोलीस अधीक्षक यांनी सोमवारी एक निवेदन जाहीर करून या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित करू नयेत, जेणेकरून कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी सतर्क आणि दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असं आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे.