नाशिक : नाशिकमध्ये शेतकरी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर NANA PATEKAR यांनी हजेरी लावली. या शेतकरी साहित्य संमेलनामध्ये नानांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर नेमकं बोट ठेवलं आणि त्यात भाजप सरकारच देखील कौतुक केलं. एकंदरीत नानांची महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेली तडफड आणि वक्तव्यातून असे वाटते आहे की नाना आता राजकारणाच्या वाटेवर आहेत की काय ? पण याबाबत देखील स्वतः नाना पाटेकर यांनी स्पष्ट मत मांडले.
यावेळी अभिनेते नाना पाटेकर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ” आधी 80 ते 90 % शेतकरी होते. आता शेतकऱ्यांची टक्केवारी ही 50 ते 60 टक्क्यावर आली आहे. तुम्ही सरकारकडे काही मागू नका आता कुठलं सरकार आणावं याचा निर्णय घ्या असा सल्ला देतानाच मला राजकारणात जाता येत नाहीये. कारण माझ्या पोटात जे आहे ते ओठावर आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मला त्या पक्षातून काढून टाकतील असं करत करत महिन्याभरात सगळेच पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचं तिथं इथे तुमच्यासमोर म्हणजेच आमच्या शेतकरी बांधवांसमोर आम्ही मोकळेपणे बोलू शकतो. आपण राजकारणाविषयी या ठिकाणी बोलू नये ते एवढ्यासाठी की मग मी फार परखडपणे बोलेन. त्यावरून पुन्हा कॉन्ट्रवर्सी होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेस वादी होते. मी कट्टर शिवसेनेचा होतो. मला भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते. मला नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा आमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात ते मला आवडतं. ज्या पद्धतीने नितीन गडकरी काम करतात ते मला आवडतं. ” असं कौतुक देखील यावेळी त्यांनी भाजपचं केल आहे.
शेतकरी समस्यांवर देखील यावेळी नाना पाटेकर यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले की, ” आम्ही कशाच्या आशेवर जगायचं ? रोज आम्हाला अन्न देणारा शेतकऱ्याची तुम्हाला किंमत नसेल तर मग आम्ही तुमची किंमत का करायची ? सरकारकडे मागू नका तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा.” असा सल्ला देखील यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.