मुंबई : सध्या महायुतीचे सर्वच उमेदवार महाराष्ट्रात Maharashtra Politics जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्व प्रमुख नेते मंडळी देखील स्वतः सभा घेत आहेत. त्याचबरोबर मोठमोठ्या राजकीय वादळांमुळे देखील महाराष्ट्राचं वातावरण सध्या तप्त आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बंद दाराआड बऱ्याच वेळ चर्चा पार पडली आहे. नेमकी चर्चा कोणत्या विषयावर झाली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, ” मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला गेलो होतो. चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र आहेत. विदर्भामध्ये ते खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे. विदर्भातील वातावरण महायुतीमय झाले आहे. मोदीमय झाले आहे. महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात दाखल होणार आहे.
चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. दरम्यान प्रचार तंत्राच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” महायुती मजबूत आहे. भक्कमपणे काम करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत. 50-60 वर्ष त्यांनी काही केलं नाही. पंतप्रधान मोदी यांनी तेच गेल्या दहा वर्षात करून दाखवलं. गेल्या 50 ते 60 वर्षात काय केले याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा असा जाब देखील एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.