अमरावती : काल अमरावतीमधून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपने पुन्हा उमेदवारी घोषित केली. अमरावतीचा पेच सुटला असं वाटत असतानाच अद्याप देखील नवनीत राणा यांच्या समोरील संकटं मात्र संपलेली नाहीत. कारण अमरावतीतून इच्छुकांची संख्या मोठी होती. अशातच उमेदवारी न मिळाल्यामुळे सर्वांनीच पाठ फिरवली असून बच्चू कडू यांनी थेट नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकला आहे.

अब मजा आयेगा – बच्चू कडू
सत्ताधारी महायुतीचा प्रहार देखील घटकपक्ष असून प्रहारचे नेते बच्चू कडू आणि त्यासोबतच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आनंद अडसूळ हे देखील या जागेसाठी इच्छुक होते. परंतु ही उमेदवारी आणि जागा भाजपला गेली असल्यानं नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी अमरावतीतून स्पष्ट संकेत दिले आहेत. बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ” उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे चांगलंच झालं आहे. अब मजा आयेगा ! आम्ही नियोजनबद्ध लढू, आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. स्वतःची पान टपरी आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. ” असं बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगून टाकल आहे.
https://www.facebook.com/share/v/iXMWBMn46Ge1qwwF/?mibextid=qi2Omg
त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नवनीत राणा यांच्यासमोर प्रहारचे बच्चू कडू यांचे आव्हान असणार आहे. अर्थात बच्चू कडू म्हणाले की, ” शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन नियोजनबद्धपणे निवडणूक लढवू. आम्ही या जागेवर चांगला उमेदवार देऊ किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ. सध्या तरी कोणता सक्षम उमेदवार वाटलेला नसून चार तारखेपर्यंत त्याचा शोध घेऊ. ” असा खळबळ जनक दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे एकंदरीतच अमरावतीची ही निवडणूक आता रंगात आली आहे.