National Press Day 2023 : भारत हा लोकशाही देश आहे आणि भारतीय प्रसारमाध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात त्यामुळे भारताच्या लोकशाही समाजात स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 16 नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय पत्रकार दिन कधीपासून साजरा केला जातो ?
१६ नोव्हेंबर १९६६ या दिवशी भारतीय प्रेस कौन्सिलचे काम सुरू झाले तेव्हापासून दरवर्षी १६ नोव्हेंबर हा दिवस पत्रकारितेचे प्रतीक म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर या दिवसाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे ‘प्रेसस्वातंत्र्य’ च्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे तसेच हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि आदर ठेवण्याच्या वचनबद्धतेबद्दल देखील बोलतो कारण भारतीय राज्यघटनेतील कलम १९ मध्ये भारतीयांना दिलेल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार’ या मूलभूत अधिकाराद्वारे भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्याची खात्री दिली जाते.त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व म्हणून देशातील नागरिकांना जागृत करणारा हा दिवस लोकशाहीच्या मूल्यांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यात प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दर्शविते.
‘प्रेस कौन्सिल’ची स्थापना नक्की कधी झाली होती व काय काम करते ?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर साल १९५६ साली प्रेस कमिशनने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली व भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण आणि पत्रकारितेत उच्च दर्जा स्थापित करण्याच्या उद्देशाने प्रेस कौन्सिल’ची कल्पना मांडली व यातूनच
त्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच ४ जुलै १९६६ रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या नियामक संस्थेची स्थापना करण्यात आली.

ही नियामक संस्था स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारितेवर देखरेख ठेवते. तर २०१२ पासून दरवर्षी १६ नोव्हेंबरला विविध मुद्रित माध्यमात पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी पत्रकारांचा सन्मान म्हणून प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ज्युरी/कौन्सिल द्वारे निवडलेल्या गेलेल्या पत्रकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केलं जातं तसेच यावेळी स्मरणिकेचेही प्रकाशनही केलं जातं. आणि देशातील महान सुधारणावादी राजा राम मोहन रॉय यांच्या सन्मानार्थ ‘नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे १ लाख रुपये रोख,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र.याशिवाय इतर पत्रकारांना दरवर्षी पन्नास हजार रुपये रोख व एक प्रशस्तीपत्र दिलं जातं.अशाप्रकारे देशात सुदृढ लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका आहे.
आता जाणून घेऊ प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया बद्दल (Press Council Of India, PCI) ही एक वैधानिक संस्था आहे जिला प्रिंट मीडियावर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे व प्रेस काऊन्सिल अॅक्ट १९७८ द्वारे जनादेशाद्वारे हे अधिकार मिळाले आहेत.याअंतर्गत एक स्पीकर (जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात) आणि इतर २८ सदस्य असतात, ज्यापैकी २० प्रेसचे प्रतिनिधीत्व करतात. पाच संसदेच्या दोन सभागृहांद्वारे नामनिर्देशित केले जातात आणि तीनजण संसदेत प्रतिनिधित्व करतात.या सर्व सदस्यांची निवड ही सांस्कृतिक, साहित्यिक आणि कायदा या विषयातून होते.
भारतातले पहिले वृत्तपत्र आणि पहिल्या महिला संपादक कोण होत्या ?
खरतर भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली ती हिकीचे ‘बेंगॉल गॅझेट’ या साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्राने.1780 साली कोलकात्यात हे वृत्तपत्र सुरू झाले होते.जे भारतातले पहिले वृत्तपत्र होते.

तर महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. तर याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये देखील अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.आणि विशेष म्हणजे साल १९०८ ते १९१२ या काळात ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं,अशा काळात महाराष्ट्रात तानुबाई बिर्जे यांनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली देखील होती. ‘तानुबाईनीं दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद त्यावेळी साभाळलं होत.त्यामुळे त्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या महिला संपादिका ठरल्या. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून त्यावेळी समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड करत बहुजन शिक्षणाचा विचार मांडला होता.
हे वाचलेत का ? विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून विठुरायाचे 24 तास दर्शन घेता येणार