भारत हा जगातला असा देश आहे ज्याला ‘भारत’, ‘हिंदुस्थान’ आणि ‘इंडिया’ अशा तीन-तीन नावांनी ओळखलं जातं. पण जर्मनी, जपान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशांना इंग्रजीतही त्याच नावांनी ओळखलं जातं. मग भारताला इंग्रजी नाव का आणि कसं मिळालं? तसंच ‘भारत’ नावाचा अर्थ काय अनेकांना हे माहीत नसतं. देशाच्या नावांचा हा विषय चर्चेत आला आहे कारण संविधानातून ‘इंडिया’ (India Vs Bharat) नाव हटवण्याची सुरू झालेली चर्चा. आजवर इंडिया नावाने जगभरात भारताला ओळखलं जायचं. पण यापुढे मात्र ‘भारत’ हेच नाव असणार असल्याचं बोललं जातंय. यामागे विरोधी पक्षांच्या आघाडीने इंडिया (India alliance) हे नाव वापरलं म्हणून संविधानातून इंडिया नाव हटवण्यात येतंय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. याविषयी जाणून घ्या.
केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवण्याचं ठरवलंय, अशी चर्चा सुरू झाली आहे. ज्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यामुळे इंडिया की भारत यावरून आता वाद सुरू झालाय. पण भारताला इंडिया आणि हिंदुस्थान या नावांव्यतिरिक्त देखील आणखी काही नावं आहेत. त्यात भारतवर्ष, जंबू द्वीप, आर्यावर्त, अजनाभवर्ष, हिन्द, हिंदुस्थान, भारत खंड, हिमवर्ष या नावांचा समावेश आहे. भारत हा जगातील एक प्राचीन देश आहे. त्यामुळे काळानुरूप देशाला ही अनेक नावं मिळाली.
‘भारत’ नाव कसं आलं (meaning of name Bharat)
सर्वात आधी ‘भारत’ हे नाव कसं आलं ते समजून घेवूया. खरंतर भारत नावावरून सुद्धा मतभेद आढळतात. अनेकजण असं म्हणतात की भरत राजामुळे देशाला भारत नाव मिळालं. पण भारत नावावरून अशा अनेक आख्यायिका आहेत. मात्र भारत हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. या शब्दाची फोड केली तर त्यात ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत असं म्हंटलं जातं.
इंडिया नाव का नको?
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या संविधानातही भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत असा उल्लेख आढळतो. पण आता जवळपास 70 वर्षांनंतर इंडिया नाव का हटवण्यात येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कुणी म्हणतं की इंडिया हा शब्द इंग्रजांनी दिलेला शब्द आहे, आता ब्रिटिश राजवट संपलेली आहे. त्यामुळे भारताला इंडिया म्हणू नये. इंडिया हा शब्द भारतीयांसाठी अपमानास्पद आहे. इंडियन हा शब्द आदिवासी आणि मागास या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे हा शब्द वापरणं बंद करायला हवे, असंही बोललं जातं.
‘इंडिया’ शब्दाचा अर्थ काय? (meaning of name India)
इंडिया शब्दाविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे इंडियाचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी इतिहास समजून घ्यायला हवे. इंडिया हे नाव मिळण्याआधी भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणूनही ओळखलं जायचं. हिंदुस्थान नाव कसं आलं? तर जेव्हा तुर्कस्तान आणि इराणचे लोक भारतात आले तेव्हा ते सिंधू खोऱ्यातून घुसले होते. हे लोक ‘स’ ला ‘ह’ म्हणायचे. म्हणजेच सिंधूला ते हिंदू म्हणायचे. त्यामुळे सिंधूचा हिंदू आणि हिंदूचा हिंदुस्थान झाला. पुढे हिंदुस्थानच्या नावावरून देशाचं नाव इंडिया ठेवण्यात आलं.
अनेकांना असं वाटतं की भारताला इंग्रजीमध्ये इंडिया म्हणतात, पण इंडिया हे भारताचं इंग्रजी नाव नाही. कारण भारतात इंग्रज राजवट सुरू झाली तेव्हा इंग्रजांना हिंदुस्थान शब्द उच्चारण्यात अडचण यायची, म्हणून त्यांनी सिंधू खोऱ्याला पर्यायी शब्द काढला. सिंधू व्हॅलीला इंडस व्हॅली देखील म्हणतात. तर सिंधू शब्दाला लॅटिनमध्ये इंडिया म्हणतात. त्यामुळे भारताला इंडिया हे नाव मिळालं. त्यानंतर जगभरात भारताला याच नावाने ओळख मिळाली.
देश स्वतंत्र झाल्यानंतर घटनेची निर्मिती झाली त्यावेळी घटनाकारांसमोर देशाच्या नावासाठी बरेच पर्याय होते. ‘हिंदुस्थान’, ‘हिंद, ‘भारत’, ‘भरतवर्ष’, ‘भरतभूमी’ इत्यादी. पण घटनेने फक्त इंडिया आणि भारत या दोन नावांचा उल्लेख केला. इंग्रजांनी दिलेला वारसा म्हणून इंडिया नावाचा स्वीकार करण्यात आला. शिवाय देशाच्या घटनेच्या पहिल्या कलमात, ज्या वाक्यानं घटनेची सुरुवात होते, त्यातही ‘इंडिया म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल’ असं वाक्य आहे. मात्र आज देशाचं नामकरण हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
इंडिया आघाडीमुळे देशाचं नाव हटवण्यात येतंय?
इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा, ही मागणी तशी जुनीच आहे. पण आता नुकतंच मोदीविरोधी आघाडीलाही इंडिया हेच नाव देण्यात आलंय. मोदी विरुद्ध इंडिया असा या विरोधी पक्षांच्या आघाडीचा प्रचार होताना दिसतो. त्यामुळे विरोधकांच्या या खेळीला शह देण्यासाठी मोदी सरकारने इंडिया नाव हटवण्याचा निर्णय घेतला आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटू लागल्या. मात्र ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ असा विरोधकांच्या इंडिया आघाडीचा नारा आहे, म्हणजेच ही आघाडी ‘भारत’ नावाचाही उल्लेख करतेच आहे. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही भारत हा उल्लेख आढळतो. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीमुळे देशाचं नाव बदलण्याच्या या टीकेला तसा काहीच अर्थ उरत नाही.