राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाने महाराष्ट्रात नवीन राजकीय भूकंप झाला. पण आता त्याहूनही मोठा भूकंप लवकरच पाहायला मिळेल, अशी चर्चा आहे. कुणी म्हणतंय की एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, कुणी म्हणतंय शरद पवारांमुळे (Sharad Pawar) भाजपविरोधी पक्षांची युती फुटेल. पण या सर्व चर्चांदरम्यान एक चर्चा अशी आहे की राष्ट्रवादीमध्ये नक्की काय चाललंय? कधी विरोधात जातात तर कधी सोबत असतात. त्यामुळे हीच फुटलेली राष्ट्रवादी आता पुन्हा एकत्र येऊन गेम पलटवेल असंही म्हंटलं जातं आहे. हा गेम नक्की काय आहे आणि तो कुणाचा होणार? ज्यामुळे पुन्हा हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळेल याचं उत्तर समजून घेऊया.
‘राजकारणात मतभेद होऊ दे, पण मनभेद नको’ ही म्हण आता पवार कुटुंबाला लागू होते. पवार काका-पुतणे नक्की लांब झाले आहेत की फक्त तसं भासवत आहेत काहीच कळायला मार्ग नाही. त्यात शरद पवारांच्या खेळीचा अंदाज येत नाही, असं त्यांच्याविषयी नेहमी बोललं जातं. पण आता शरद पवार भाकरीऐवजी तवाच फिरवणार का? असा प्रश्न पडला आहे. कारण एकीकडे अजित पवार काकांची भेट घेतात, मग त्यांचे समर्थक आमदार शरद पवारांच्या भेटीला जातात, तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांचे प्रदेशाध्यक्ष एकमेकांची गळाभेट घेतात.
हे सर्व पाहता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परत एकत्र येणार का? जर राष्ट्रवादी एकत्र आलीच तर पुढे काय घडणार? सध्या कार्याध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळेंचं काय होणार? अजूनही मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार का झालेला नाही. त्याचबरोबर अजित पवारांचं मुख्यमंत्री पद अजून का रखडलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात.
अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद का रखडलं?
मागच्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. पण मग अद्याप त्यांचं मुख्यमंत्रीपद का रखडलं? यामागे त्यांचे काकाच तर नाहीत? किंवा काकांची मनधरणी करून त्यांनाच आपल्या बाजूने करून घेण्यासाठी अजित पवार शर्थीचे प्रयत्न करत आहेत का? अशा शक्यता नाकारता येत नाहीत. राष्ट्रवादी पक्ष फुटून त्यात दोन गट पडले असले तरी दोन्ही गटातल्या आमदारांमध्येही आणि प्रमुखांमध्येही संवाद आणि मैत्री अजूनही तशीच आहे.
शरद पवारांचे आशीर्वाद का हवेत?
राष्ट्रवादीतला एक गट बाहेर पडून अजित पवारांचं नेतृत्व मान्य करत असला तरी आशीर्वाद घ्यायला शरद पवारांकडे जातोय, ही महत्त्वाची बाब आहे. अजित पवारांनी तर भर सभेत काकांवर ताशेरे ओढले होते. त्यांच्या समर्थकांनी सुद्धा अजितदादांवर कसा अन्याय झाला हे सांगताना डोळ्यातून अश्रु गाळले. असं असतानाही त्याच शरद पवारांचे आशीर्वाद अजित पवार गटाला का हवेत यामागे मोठं राजकारण असू शकतं. त्यातच शरद पवार यांनी यापूर्वी भाजपसोबत सत्ता वाटपाची पद्धत ठरवण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचा समावेश असलेली चार सदस्यीय समिती स्थापन केली होती, असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
ज्यांना व्हिलन ठरवलं त्यांनाच सर्वाधिक निधी
काकांच्याच पावलावर पाऊल टाकत अजित पवारांनी पक्ष फोडला आणि बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा केला. मग शरद पवार मैदानात उतरले आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. मात्र अजूनही काही आमदार हे ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. परंतु आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजितदादांकडे आल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना पुन्हा सोन्याचे दिवस आले, असं म्हणण्यास हरकत नाही. अजित पवारांनी फक्त त्यांच्या समर्थक आमदारांनाच निधी दिला असं नाही, तर बंडावेळी ज्या जयंत पाटलांना व्हिलन ठरवण्यात आलं त्यांनाच सर्वाधिक निधी देण्यात आला, असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खरंच बंड झालंय की हा फक्त पॉलिटीकल ड्रामा सुरु आहे, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.
पडद्यामागे हालचाली सुरू
फुटीर आमदार आणि अजित पवार फक्त शरद पवारांची भेटच घेत नाही आहेत, तर त्यांची मनधरणी सुद्धा करत आहेत. आपल्या बाजूने येण्यासाठी त्यांना मनवत आहेत, असंही बोललं जातंय. तशी भाजपचीच इच्छा असल्याचं समजतंय. अजित पवारांनी जर शरद पवारांना मनवलं तर त्याबदल्यात त्यांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल. पण शरद पवारही वयाच्या त्र्याऐंशीतही रिंगणात उतरण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे तेही मागे हटणार नाहीत. पण अजित पवरांनी सुद्धा त्यांची पॉवर दाखवून दिली आहे.
भाकरी नाही, तवा फिरवणार…
याशिवाय सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. ज्या बारामतीत अजितदादांचा मोठा पगडा आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय ती जागा लढवणं सुप्रिया यांना कठीण आहे, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. एकूणच थोरल्या पवारांसमोर असलेल्या अडचणी पाहता ते आता भाकरी नाही तर तवाच फिरवणार असल्याची शक्यता आहे. याचाच अर्थ पक्षाचं नेतृत्व ते अजित पवारांकडे सोपवतील. पण त्यासाठी त्यांच्यात एक डील होऊ शकते, असं सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे.
या डीलनुसार अजित पवार गटाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राजीनामा देतील आणि प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटलांकडे कायम राहील. शिवाय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातही पाटलांचा समावेश होईल. तर सुप्रिया सुळेंना थेट केंद्रात स्थान मिळेल. तर या वाटाघाटीमुळेच अद्याप मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार झालेला नाही. शिवाय अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदही म्हणूनच रखडलं, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.