राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. यामुळे मंत्रिपदासाठी अनेक आमदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच खाती आणि पदांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे गटातील भरत गोगावले यांचं नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. पण गोगावले यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. (Bharat Gogawale vs Aditi Tatkare)
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यातच गोगावलेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पदाविषयी बोलताना गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले गोगावले?
गोगावलेंनी बुधवारी (12 जुलै) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी सुद्धा सरकारमध्ये सामील झाली असल्याने रायगडचं पालकमंत्री पद अदिती तटकरेंना मिळू शकतं, अशी शक्यता विचारण्यात आली, ज्यावर गोगावले म्हणाले की “आम्ही अदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा तर फरक असतोच ना.”
समस्त महिलांचा अपमान
पुढे गोगावले म्हणाले, “मला आमदारकीचा 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन करू. तसंच सहाच्या सहा आमदारांची एकच मागणी आहे की रायगडचा पालकमंत्री, भरतशेठ. आमची ही मागणी शेवटपर्यंत राहणार, अगदी शेवटच्या टोकापर्यंत राहणार”, असंही गोगावले यांनी यावेळी सांगितलं. गोगावलेंच्या या वक्तव्याने केवळ अदिती तटकरे नाही तर सर्व महिलांचा अपमान झाला आहे, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे.
गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे आता शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा केवळ अजित पवार गटानेच नाही तर शरद पवार समर्थक नेत्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला आहे. शरद पवार गटातले आमदार रोहित पवार यांनी गोगावलेंवर टीका केली आहे. “भरत गोगावले यांच्या विधानाने केवळ अदिती तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर राज्यातील 6 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
“स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध! शरद पवार यांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान सधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे?” असा सवाल रोहित पवारांनी या ट्विटमधून केला.
अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही गोगावलेंवर निशाणा साधला आहे. चाकणकर म्हणाल्या, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.”
“भरत गोगावले, आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता, जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी”, असं म्हणत चाकणकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील गोगावलेंच्या वक्तव्याचा निषेध करत महिला-पुरुष असा फरक करु नये, असं सांगितलं.
पालकमंत्री पदाची स्पर्धा
खरंतर शिंदे गट भाजपसोबत सत्तेत आल्यापासूनच भरत गोगावले मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. इतकंच काय तर आपलं मंत्रिपद नक्की असून रायगडचं पालकत्त्व सुद्धा आपल्याकडेच असेल, असा विश्वास त्यांना आहे. पण आता या स्पर्धेत राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यादेखील उतरल्या आहेत. त्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे.