मुंबई : सोमवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चेला हवा दिली आणि त्यानंतर काही वेळातच काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडले आहे.
अनेक वर्षांपासून निष्ठावंत आणि अनुभवी नेता अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेतच यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाउंट वरून त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘ काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू’. असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशोक पवार आता भाजपच्या वाटेवर आहेत. अशी चर्चा असली तरी याबाबत मात्र अधिकृत माहिती नाही. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे येणारा काळच स्पष्ट कळेल .